सामना चित्रपटाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष   

कोहिनूर कट्ट्याचे २ जून रोजी उद्घाटन 

पुणे : चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड मानला जाणारा व राजकारण हा विषय केंद्रस्थानी असणार्‍या पहिल्या मराठी ’सामना’ चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण होत आहे. चित्रपट सृष्टीला सामना चित्रपटाने दिलेल्या योगदानाबद्दलची विशेष चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. २ जून) कोहिनूर कट्टयाचे आयोजन करण्यात आले आहे. या कट्टयाचे उद्घाटन दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात केले जाणार आहे. हा कार्यक्रम रात्री आठपर्यंत सुरू राहणार आहे. 
 
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते कोहिनूर कट्याचे उद्घाटन होईल. याप्रसंगी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांच्या गिरिराज पिक्चर्सने सादर केलेला आहे. या चित्रपटला ३ राष्ट्रीय पुरस्कार, ७ महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि ३ फिल्म फेअर मिळाले आहेत. या चित्रपटामध्ये कला, संस्कृती, राजकारण आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. निर्मात्याला सन्मान मिळावा, या उद्देश्याने पहिला ’साहित्य कला गौरव सामना सन्मान’ वाळवी या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटास दिला जाणार आहे. निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी या सन्मानाचा स्विकार करणार आहेत. या चर्चासत्रात कलाकार डॉ. मोहन आगाशे, विलास रकटे, निर्माते रामदास फुटाणे सहभागी होणार आहेत. स्नेहल दामले सूत्रसंचालन करणार आहेत.हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याचा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विनीत गोयल, आशय फिल्म कल्बचे वीरेंद्र चित्राव व सतीश जकातदार आणि साहित्य कला गौरवचे गौरव फुटाणे यांनी केले आहेत.
 

Related Articles